हर्षवर्धन पाटील यांनी राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा घरी जाऊन केला सत्कार
- सुरवड येथे केला सत्कार
- कल्याणी मानेस इ.10 वीला 100 टक्के गुण
- गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी.
इंदापूर: प्रतिनिधी दि.17/8/21
महाराष्ट्र राज्यात दहावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या कल्याणी तुकाराम माने या बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीचा तिच्या सुरवड येथील घरी जाऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.16) सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी तिने भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) जाऊन अधिकारी होण्याचा मानस असल्याचे हर्षवर्धन पाटील यांना सांगितले.
सत्कार प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांनीचे वडील तुकाराम माने व कुटुंबियांशी संवाद साधला. कल्याणी माने हिचा इ. 11वी. व 12 वी.चा शिक्षणाचा खर्च श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी करेल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.
बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इ. 10 वी.ची कल्याणी माने विद्यार्थिनी आहे. या शिक्षण संस्थेचे हर्षवर्धन पाटील हे अध्यक्ष आहेत. इतर वेगळा क्लास न लावता, विशेष मार्गदर्शन नसताना व दहा बाय दहा फुटाच्या कुडावरती पत्र्याचे छप्पर असलेल्या खोलीत राहून तिने गरीब परिस्थितीत राज्यात मिळविला प्रथम क्रमांक ही विशेष अभिनंदनीय बाब असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
कल्याणी माने हीच्या राहत्या घराची स्थिती पाहून हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माने कुटुंबीयांना घरकुल देण्याची सूचना केली. याप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे सचिव सरपंच किरण पाटील, दादासाहेब घोगरे, सुरेश मेहेर, सुरेश घोगरे, रावसाहेब घोगरे, दशरथ घोगरे, प्रकाश घोगरे, जी.जे.जगताप उपस्थित होते. कल्याणी माने हिने बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे.
_____________________________
Comments
Post a Comment