भिमाई आश्रमशाळेत टॅबचे वाटप
( इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते वितरण).
इंदापूर धनश्री गवळी.(दि.२०) :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील इ. ९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी दिलेल्या टॅबचे वितरण आश्रमशाळेवर छोटेखानी घेतलेल्या कार्यक्रमात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्री. पाटील यांनी अभिवादन केले.
तहसिलदार श्रीकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, म्हणून शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या टॅबचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.त्यातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययना बरोबरच तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होईल असे यावेळी पाटील म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले की, ऑनलाईन शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे असे यावेळी नमूद केले.
पाटील पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असताना आपण खूप मेहनत, कष्ट व अभ्यास करा. त्यामुळे तुमच्या पासून यश कधीच दूर जाणार नाही. तुम्ही मोठे अधिकारी व्हाल.भविष्यात विविध क्षेत्रात काम करताना माणूस म्हणून जीवन जगताना सामाजिक जाणिवेतून पीडित, वंचित, गरीब कष्टकरी, निराधारांना चांगली वागणूक द्या, मदत करा. महापुरुषांची विचारधारा अंगीकारा. त्यांनी दिलेली दिशा आणि विचार आत्मसात करा, असा मौलिक सल्ला यावेळी श्री. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत, जे निराधार आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करा,मला द्या शासन नियमानुसार मिळणारी आर्थिक मदत त्यांना दिली जाईल अशी सूचना यावेळी पाटील यांनी केली.
दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या आठवणींना उजाळा श्री. पाटील यांनी दिला.
यावेळी मा. दाजी देठे, पोलीस उपनिरीक्षक इंदापूर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) , सचिव ॲड. समीर रत्नाकर मखरे, संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे ,ॲड. नितीन राजगुरू (मुंबई हायकोर्ट), गलांडवाडी नं.२ चे सरपंच गोपीचंद गलांडे, माजी सरपंच विलास शिंदे, संतोष(आण्णा)मखरे, प्रगतशिल बागायतदार दादा चव्हाण, भारत मुक्ती मोर्चाचे नानासाहेब चव्हाण, गुप्तवार्ताचे पवन भोईटे, पोलिस नाईक गायकवाड, संतोष शेंडे, प्रा.युवराज बन सर तसेच विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले तर आभार मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मानले.
Comments
Post a Comment